Ashish Shelar | “मनसेने आम्हाला शहाणपण शिकवू नये, अन् पवार आम्हाला सल्ला….”- आशिष शेलार

Ashish Shelar | मुंबई : मुंबईमधील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ या संस्थेत गुजरात दंगलीवर आधारीत असलेली बीबीसीच्या माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यावरुन आता दिल्ली आणि कोलकाता नंतर मुंबईतही राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला इशारा दिला आहे.

बीबीसीच्या माहितीपटावरुन भाजपला सल्ला देणाऱ्या शरद पवार आणि मनसे पक्षावर सडकून टीका केली आहे. “मनसेने आम्हाला शहाणपण शिकवू नये. तसेच शरद पवारांनी आम्हाला सल्ला देत असताना केतकी चितळे प्रकरणात ही भूमिका का नाही घेतली?” असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

“लोकशाहीमध्ये कुणाचाही हक्क हिरावून घेता येत नाही” अशी मनसेने बीबीसीच्या माहितीपटावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “आम्ही कुणाचाही हक्क हिरावून घेत नाहीत. जे मनसेचे लोक आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. त्यांनी मनसेच्या विरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांना शिवाजी पार्कवर आणून खळ्ळखट्याक करा असे सांगितले होते. तेव्हा हे सांगताना त्यांना लोकशाही आठवली नाही का?” असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

“बीबीसीच्या माहितीपटाने अपप्रचार, दुष्प्रचार आणि असत्य पसरविण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या संस्थेत बीबीसीचा माहितीपट दाखविण्याचे काम विशिष्ट धर्माच्या संघटननेने केले असल्याची आमची माहिती आहे. हा विषय मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे कारण बनू शकतो, अशी भावना कार्यकर्ते आणि जनतेमध्ये आहे. म्हणून आम्ही पोलिसांना अवगत केले आहे, यावर वेळीच कारवाई करा.” असेही आशिष शेलार म्हणाले आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बदनामीचा प्रयत्न मुद्दामहून केला जात आहे. भावना भडकविण्याचा प्रयत्न होत आहे, त्यावर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत. तसेच TISS ने असे धंदे बंद करावेत. TISS च्या आडून जर काही संघटनना हे काम करत असतील तर त्यांनी राजकारणात समोरासमोर येऊन सामना करावा”, असे आव्हान आशिष शेलार यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या