Atul Londhe | “पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी झोपा काढल्या काय?”

Atul Londhe | नागपूर : राज्यात विधान परिषद निवडणुकांमधील प्रचारात सर्वात महत्वाचा मुद्दा ठरत आहे तो म्हणजे OPS अर्थात जुनी पेन्शन योजना. अवघ्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या योजनेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन पुनर्विचार करायला भाग पाडलं आहे.

काँग्रेससह महाविकास आघाडीचा जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा आहे तर भाजपचा या पेन्शन योजनेला विरोध आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना खोचक सवाल केला आहे.

ते म्हणाले, “जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. ही योजना पुन्हा लागू करण्याची ‘धमक’ फक्त भाजपमध्येच आहे, असा दावा ते करतात. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे विधान केले असले तरी फडणवीस यांच्या कपटनितीची शिक्षकांनाही कल्पना आहेच.”

त्याचबरोबर “जुनी पेन्शन योजना लागू करण्याची ‘धमक’ आहे, तर मग पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी झोपा काढल्या काय?”, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस पक्षाचा केवळ पाठिंबाच नसून काँग्रेसशासित राज्ये राजस्थान, छत्तीसगड, व हिमाचल प्रदेशमध्ये जुनी पेन्शन योजना लागूही केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढता दबाव व काँग्रेसशासित राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्यानं फडणवीसांचा विचार बदललेला दिसतो. काहीही झालं तरी जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, असं लोंढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :