BJP | “पहाटेच्या शपथविधीच्या कटात ठाकरेंचाही हात”; भाजपचा गंभीर आरोप

BJP | नागपूर : “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते,” असे जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटीलांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

“शरद पवारांच्या शकुनीमामासारख्या खेळीमुळे अजितदादांचा बकरा झाला, पहाटेच्या शपथविधीच्या कटात उद्धव ठाकरेंचाही हात होता”, असा गंभीर आरोप आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

आणखी काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शरद पवारांचं नाव घेऊन त्यांनी खेळी केली असा दावा केला. यातूनच हे स्पष्ट झालंय की बहुमत मिळालेल्या देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत येऊ न देण्यासाठी हे केलं आहे. शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून ही खेळी करण्यात आली. शकुनीमामा सारखी दुष्ट खेळी त्यांनी केली. त्यासाठी आपल्याच घरचा ऊर्जावान कार्यकर्ता अजित पवार यांचा बळीचा बकरा करावा लागला”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

“राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी झालेली पवारांची चौकशीबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले की, ईडीची चौकशी काही फडणवीस अथवा बावनकुळे यांच्या सांगण्यावरून लागत नाही. तर कोणाच्यातरी तक्रारीनंतर चौकशी लागते. चौकशा चालत राहतात, महाविकास आघाडीनेही माझी चौकशी केली होती. कुठली चौकशी लागली म्हणून असे षडयंत्र केले जात नाही. त्यामुळे असे कुठले कारण होते की फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवार यांना अजित पवारांचा बळीचा बकरा करावा लागला. हे सर्व आज ना उद्या शरद पवार यांना जनतेला सांगावं लागेल की त्यांनी असं षडयंत्र का केले? नाहीतर जयंत पाटील खोटं बोलत आहे हे तरी सांगावे लागेल”, असे चंद्रशेखर बावनुकळे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या