BJP | राष्ट्रवादीत जयंत पाटील यांची घुसमट होत आहे?; चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

BJP | नागपूर : “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते,” असे जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. ‘जयंत पाटील हे राष्ट्रवादीत नाराज’ असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत.

“शरद पवारांच्या शकुनीमामासारख्या खेळीमुळे अजितदादांचा बकरा झाला, पहाटेच्या शपथविधीच्या कटात उद्धव ठाकरेंचाही हात होता”, असा गंभीर आरोप आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शरद पवारांचं नाव घेऊन त्यांनी खेळी केली असा दावा केला. यातूनच हे स्पष्ट झालंय की बहुमत मिळालेल्या देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत येऊ न देण्यासाठी हे केलं आहे. शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून ही खेळी करण्यात आली. शकुनीमामा सारखी दुष्ट खेळी त्यांनी केली. त्यासाठी आपल्याच घरचा ऊर्जावान कार्यकर्ता अजित पवार यांचा बळीचा बकरा करावा लागला”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

“आजवर आम्ही उद्धव ठाकरे यांनीच फडणवीस यांच्याविरोधात कट केला होता, असे समजत होतो. मात्र आता जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर शरद पवारही त्यामागे होते हे स्पष्ट होत आहे. पण जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे निर्दोष आहेत हे सिद्ध होत नाही. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघेही या कटामागे होते”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

जयंत पाटील राष्ट्रवादीत नाराज?

“या प्रकरणातून शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आपली प्रतिष्ठा गमावली आहे. जर जयंत पाटील खोटं बोलत असतील तर जयंत पाटील शरद पवारांना का बदनाम करत आहेत असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही म्हणून हे होत आहे का? की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांची घुसमट होत आहे? असाही प्रश्न निर्माण होतो” असं बावनकुळे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या