Jitendra Awhad | गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेचा आव्हाडांनी घेतला समाचार

Jitendra Awhad | मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनातील भाषणात धर्मवीरच्या मुद्द्यावर सभागृहात भाष्य केलं होतं. ‘आज संभाजी महाराज यांच्या विषयी काही लोक चुकीचं बोलतात. त्यांना धर्मवीर बोलतात, पण संभाजी राजे हे स्वराज्यरक्षकच होते’, असं अजित पवार म्हणाले होते. पवारांच्या याच वक्तव्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर बोलताना पडळकर म्हणाले की, “संभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाही, त्यांची कदाचित सुंता झाली असती, माध्यमांनी जाऊन पहा.”, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. पडळकरांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. पडळकरांनी केलेल्या टीकेचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये नवा वाद उफाळला आहे.

“तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा. तुमच्या म्हणण्याला माझ्या दृष्टीने शून्य अर्थ आहे. संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, असे अजित पवार म्हणाले. मी या मताशी सहमत आहे. संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच होते. संभाजी महाराज अन्य काही विचार करत असते, तर त्यांनी सुलतान अकबराला आपल्या जवळ सहा वर्षे ठेवलेच नसते. आपल्या मुलाने बंड केले. या बंडाला संभाजी महाराज मदत करत आहेत, ही बाब औरंगजेबाला सहन होत नव्हती. औरंगजेब अंगावर येण्याचे हे एक कारण होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

‘मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती संभाजी महाराज यांना आपण जाणीवपूर्वक स्वराज्यरक्षक म्हणतो. ते स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. पण, काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात, मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा.’ असं अजित पवार म्हणाले होते.

गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर टीका

‘आज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी काही लोकं चुकीचं बोलतायेत. धर्मवीर संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं बोलतायेत. आपल्या सगळ्यांना इतिहास माहित आहे. धर्मवीर संभाजी महाराजांसोबत कशा चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला. त्यांना धर्म बदलण्यासाठी किती त्रास दिला. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलला नाही.’ ‘संभाजी महाराज हे धर्मवीर नसते.. जे कोणी म्हणतायेत संभाजी महाराज धर्मवीर नव्हते त्यांची कदाचित सुंता झाली असती. जर त्यांना तसं वाटत असेल तर मीडियाला माझी विनंती आहे की, त्यांना जाऊन चेक करा. काय परिस्थिती आहे त्यांची. ही परिस्थिती झाली असती की नसती ते सांगा.’ असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.

महत्वाच्या बातम्या