Raju Shetty | “सेंद्रिय शेतीचं नुसतं तुणतुणं वाजवलं”; अर्थसंकल्पाबाबत राजू शेट्टी मोदी सरकारवर संतापले

Raju Shetty | कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून साफ निराशा झाल्याचं म्हटलं आहे. या देशातील केवळ 4% लोकांनाच हमीभाव मिळतो. शेतीसाठी सरकार करतंय काय? भरड धान्य शेतकऱ्याला परवडत का? सरकारने फक्त सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवले, असं म्हणत स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.

“आजच्या या अर्थसंकल्पामधून माझी तरी साफ निराशा झालेली आहे. किमान पुढच्या वर्षी निवडणुका असल्या कारणानं हे या सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प होता. किमान निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन तरी काही घोषणा अपेक्षित होत्या”, असं राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले.

साखर कारखान्यांचे वजन काटे डिजीटल होत नाहीत? तिथं शेतीत काय डिजीटल पायाभूत सुविधा आणणार आहेत?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. कापूस उत्पादकसाठी नवनवीन बियाणे आणि संशोधन कारण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नाही. किमान हमीभाव कायदा करावा तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, असंही राजू शेट्टी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “जीएसटीच्या माध्यमातून सातत्यानं सामान्य माणसाच्या खिशातून पैसा काढायचे उद्योग तर सरकारचे चालू आहेत. कारण जीएसटीचे संकलनाचे आकडे दिवसेंदिवस वाढताना दिसतात. मग तो पैसा गेला कुठं? जातो कुठं? आणि त्यातून काही पायाभूत सुविधा मागणं हा आमचा अधिकार आहे.”

महत्वाच्या बातम्या :