“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्यावरुन मनसे आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.या निर्बंधांमुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. यात ते बोलत होते.
तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.
यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधलाय. घंटानाद करा नाही तर आणखी कसला नाद करा. पण आमचा नाद करायचा नाही, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. तसेच राजकीय पोळ्या भाजून घेणारे हे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. पण त्यांचं या मागे राजकारण आहे हे सर्वसामान्य लोकांनाही माहीत आहे. विरोधकांनी भावनेचा नाही लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बिळात जातात, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- जनतेचे आशीर्वाद कशाला हवेत, जनतेचा जीव धोक्यात घालायला?; उद्धव ठाकरे
- दहीहंडी म्हणजे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही; राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं सणसणीत प्रत्युत्तर
- “अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?”आण्णांच्या ‘जेलभरो आंदोलना’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
- काही राजकीय पक्षांना जनतेमध्ये बेस नाही, दहीहंडीवरुन संजय राऊतांची मनसेवर अप्रत्यक्ष टीका
- ‘तो फेरीवाला जेलमधून बाहेर येईल, त्यादिवशी त्याची सर्व बोटे छाटली जातील’; राज ठाकरे आक्रमक