Uddhav Thackeray | “उद्या खोकेवाल्यांच्या घरात…”; राणा-कडू वादावरून ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Uddhav Thackeray | मुंबई : आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला होता.गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला उत्तर देताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता. आता हा वाद मिटला आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाकडून राणा-कडू वादावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामना (Saamana) अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना या दोन आमदारांचा ‘राडा’ संपविण्यात काही दिवस खर्चावे लागले. अमरावतीमधील दोन आमदार बच्चू कडू व रवी राणा यांच्यात एखादा तात्त्विक वाद राज्याच्या किंवा लोकांच्या विकासासाठी घडला असता तर समजण्यासारखे होते. विदर्भातील मोठे उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले व वैदर्भी जनतेचा लाखोंचा रोजगार बुडाला म्हणून या दोघांत भांडण पेटले असते तरीही ते समजून घेता आले असते. विकासासाठी निधी कमी पडत आहे, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत यावर दोन आमदारांनी शब्दांची ढाल-तलवार चालवली असती तरी जनतेने त्यांचे स्वागत केले असते व त्यांच्या तोंडून निघालेली चिखलफेक सहन केली असती, पण दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरून सुरू झाले व महाराष्ट्राने तमाशा पाहिला.
रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. संकट आले व सत्य बोलायचे असेल तर ते हनुमान चालिसा वाचतात व बेभानपणे आरोपांची गदा फिरवितात. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल. आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते. त्याला कोण काय करणार?, असा खोचक सवाल करत अग्रलेखातून बंडखोर नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री महोदयांच्या भेटीनंतर राणा यांनी खोक्यांसंदर्भातले त्यांचे शब्द मागे घेतले आहेत. त्यांनी दिलगिरी वगैरे व्यक्त केली, पण राणा यांनी हे शब्द मनापासून मागे घेतले काय ही शंकाच आहे. कारण रवी राणा यांनी बुधवारी पुन्हा ‘आम्हाला कोणी धमक्या देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमत आहे’, अशी थेट धमकीच कडू यांना दिली आहे. त्यावर कडू यांनीही ‘मी पाच तारखेला घरी आहे. त्यांनी मारायला यावं’ असा प्रतिइशारा दिला आहे. म्हणजे राणा-कडू यांच्यातील वाद मिटलेला नाही असाच याचा अर्थ. अर्थात महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेच्या मनात ५० आमदारांची प्रतिमा ‘खोकेवाले’ अशीच आहे व हे आमदार कोठेही गेले तरी त्यांना ‘खोकेवाले’ असेच म्हटले जाणार. पन्नास आमदारांचे सरकार हे बेकायदेशीर आहे. घटनेच्या पायावर ते उभे नसून प्रत्येकी पन्नास कोटींच्या खोक्यांवर ते उभे आहे. त्यामुळे त्यांच्यात एकजिनसीपणा नाही. नैतिकता आणि विचारांचे सूत्र नाही. महाराष्ट्राविषयी आस्था नसल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | दारु विधानावरुन ठाकरेंचा कृषीमंत्र्यांना सत्तारांवर हल्लाबोल, म्हणाले…
- Sharad Pawar | शरद पवारांच्या तब्येतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या…
- Bachhu Kadu । “मरण्यासाठी तयार राहतो, कोणत्या चौकात येऊ ते…”; राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं प्रत्युत्तर
- Sambhaji Bhide | महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; “आधी कुंकू लाव, मगच…”
- Ravi Rana । “दम दिला तर घरात घुसून…”; बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रवी राणांचा पलटवार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.