Uddhav Thackeray | “महागाई अन् बेरोजगारीचं काय?”; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा खोचक सवाल

Uddhav Thackeray | मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून यावर टीका सुरू असतानाच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सवाल उपस्थित केले आहेत.

हा अर्थसंकल्प म्हणजे 2024 ची निवडणूक लक्षात घेऊन मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतीचा विचार केला तर, शेतकऱ्यांसाठी यापूर्वी ज्या काही घोषणा करण्यात आल्या होत्या त्याची आज काय स्थिती आहे? स्वामिनाथन आयोगाची अमलबजावणी करण्याचा निर्णय म्हणजेच शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्च आधारित भाव द्यावा. पण आजच्या अर्थसंकल्पात याचा कुठेही उल्लेख नसल्याचे दानवे म्हणाले.

वित्तीय तुट पहिली तर 2014 ची आणि आत्ताची दुप्पटीने वाढली आहे. दोन कोटी लोकांना रोजगार देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते त्याचे काय झाले? त्यात महागाई गगनाला भिडली आहे, पेट्रोल-डीझेलचे दर वाढले आहेत. जनतेला ज्या गोष्टींशी देणघेणं नाही अशा गोष्टीचे दर कमी करण्यात आले आहे. सोबतच महिलांना देखील या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नसल्याचा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.

एकीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार असे जाहीर करायचे आणि दुसरीकडे कापूस आयातीचे धोरण राबवायचे  हा मोदी सरकारचा दुटप्पीपणा असल्याचं दानवे म्हणालेत. सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :