Weather Update | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून केले जात आहे.

उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नाशिक ( Nashik ), धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 13 मार्च रोजी या तीन जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटंसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरित कामं लवकरात लवकर उरकून घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून केले जात आहे.

उत्तर भारतामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर पूर्व भारतामध्ये 10 ते 11 मार्च या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टीसह गोवा आणि कर्नाटक किनारपट्टी भागात येत्या दोन दिवसांमध्ये तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन हवामान विभागाकडून केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.