महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा; लोकशाही समृद्ध करण्याचा संकल्प करु या- विभागीय आयुक्त मधुकर अर्दड  

छत्रपती संभाजीनगर, दि. (जिमाका):- मतदान करणे हा आपला हक्क असून मतदान करुन आपण आपली लोकशाही अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करु या,असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी आज मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज देवगिरी पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया,अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. नंतर शानदार संचलन होऊन मानवंदना देण्यात आली.

या सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस पदक सन्मान व आदर्श तलाठी पुरस्कार

या सोहळ्यात विभागीय आयुक्त अर्दड यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व पदक देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात पोलीस अधीक्षक संदीप पालवे, पोलीस निरीक्षक संभाजी पवार, कृष्णचंद्र केशवराव शिंदे, सहा. पोलीस उपनिरीक्षक अशोक गंगावणे, कैलास कामठे, संदेश किर्तीकर, संतोष उफाडे, सहा. फौजदार अनिल भावसार, सुरेश नवले, विश्वास शिंदे, हवलदार विजय कुरकुरे, नवनाथ खांडेकर, सिद्धार्थ थोरात, नदीम शेख, नामदेव शिरसाठ, शरद झोंड, कासिम शेख, ज्ञानेश्वर पगारे, किशोर काळे, राजकुमार जोनवाल, पोलीस नाईक मिलिंद इपर, हवलदार भिमराज जिवडे, विजय कर्पिले, शिपाई गौरव जोगदंड, विलास सुंदर्डे, नितीष घोडके, रविंद्र खरात, गोपाल सोनवणे यांचा समावेश होता. तसे योगेश लक्ष्मणराव पंडीत माळीवाडा तलाठी यांना आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.