लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे

            मुंबई, दि. ६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले.

               लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाच्या नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी श्री. पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.

               या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, सर्वसाधारण निरीक्षक गौरी शंकर प्रियदर्शी, निवडणूक पोलीस निरीक्षक मुकेश सिंह, अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात, समन्वय अधिकारी तुषार मठकर, उपसंचालक (वित्त) चित्रलेखा खातू यांच्यासह विविध नोंदणीकृत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            मतदारांनी उन्हापासून योग्य ती काळजी घ्यावी. मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून प्रथमोपचार पेटी, वेटिंग रूम व इतर आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. मुंबईत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

               निवडणूक प्रक्रिया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देऊन श्री. पानसरे म्हणाले, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत आहे. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. प्रचारविषयक नियम, निवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

            याप्रसंगी ११ नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांना व अन्य १५ उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसन श्री. पानसरे यांनी यावेळी केले. ईव्हीएमबाबतच्या शंका, रॅन्डमायझेशन कसे होते, याबाबतचे प्रात्यक्षिक निरीक्षकांसमोर उमेदवारांच्या प्रतिनिधींना ८ मे रोजी दाखविले जाणार असल्याचे श्री. पानसरे यांनी सांगितले.

            निवडणूक काळात सोशल मीडिया वापरताना उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी योग्य ती काळजी घ्यावी, डिपफेक व्हिडिओ करणे हा गुन्हा आहे. रॅली काढताना वाहतुकीला अडथळा होईल, अशी कृती करता कामा नये, स्पीकरची परवानगी पोलिसांकडून घ्यावी, ७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजांवर बंदी असल्याचे अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर यांनी यावेळी सांगितले.

**

शैलजा पाटील/विसंअ/