आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

मुंबई, दि. ६ : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कटकधोंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, सर्वसाधारण निरीक्षक राजीव रंजन, निवडणूक पोलिस निरीक्षक मुकेश सिंह, अपर पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, ऋषीकेश वाघ यांच्यासह नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. कटकधोंड म्हणाले, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी. उमेदवारांनी त्यांच्या दैनंदिन खर्चाचा हिशेब ठेवावा. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे श्री. कटकधोंड यांनी निरसन केले. ईव्हीएमबाबत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना १२ ते १४ मे दरम्यान निरीक्षकांसमोर प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. त्यामुळे निवडणुका शांततेत व सुरळीतपणे होण्यासाठी सहकार्य करावे, असेही श्री. कटकधोंड यांनी सांगितले.

दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था करावी. तसेच प्राथमिक सुविधाही पुरवाव्यात, अशा सूचना यावेळी उपस्थितांनी केल्या. मुंबई शहर प्रशासनाकडून याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याचे श्री. कटकधोंड यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/