मुंबई शहर जिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर ६१ तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण

मुंबई, दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात १६ मार्च पासून आज पर्यंत ६१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या सर्व तक्रारीचे जिल्हा निवडणूक विभागाकडून निवारण करण्यात आले.

कोणताही नागरिक निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकतो. या तक्रारीवर अवघ्या १०० मिनीटात कार्यवाही करण्यात येते.

जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे, ती तक्रार प्राप्त होताच विहित कालावधीत त्यावर कार्यवाही होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोग यांनी नॅशनल ग्रिव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) हे नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात. https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर मुंबई शहर जिल्ह्यातील  १६ मार्च ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत मतदार नोंदणीशी संबंधित एकूण ७७४ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ७६९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.उर्वरित ५ तक्रारींबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून दिली.

0000

शैलजा पाटील/विसंअ