Satyjeet Tambe | “त्यांच्या सल्ल्याला माझा पुर्णपणे विरोध होता”; सत्यजीत तांबेंनी सांगितलं बंडखोरीचं कारण

Satyjeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर सत्यजित तांबेंनी अपक्ष निवडणूक लढवत विजय खेचून आणला. अपक्ष निवडून आल्यानंतर ते भाजपत जाणार की काँग्रेसमध्येच राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

“मागील महिनाभराच्या काळात आमच्या कुटुंबावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आमचं कुटुंब सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात आहे. 2030 मध्ये आमच्या कुटुंबाला काँग्रेस पक्षात येऊन 100 वर्षे होतील. आम्ही पक्षासाठी निष्ठेनं काम केलं. विविध आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही काम केलं. युवक काँग्रेससाठी काम करताना माझ्यावर 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे मला पासपोर्टही मिळत नव्हता. मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे.”, असे सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.

“पण जेव्हा मी आमचे पक्षश्रेष्ठी एच के पाटील यांना भेटून मला संधी द्या, असं सांगितलं. मला संघटनेत एखादं पद किंवा जबाबदारी मागितली होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागेवर विधान परिषदेची निवडून लढा असं सांगण्यात आलं, असं जेव्हा एच के पाटील बोलले तेव्हा मला प्रचंड संताप आला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, माझ्या वडिलांच्या जागेवर जर मला निवडणूक लढवायची असती, तर मी 22 वर्षे संघटनेसाठी जे काम केलं, हा विचार वाढवण्याचं काम केलं. मला पक्षाने किंवा संघटनेनं काहीतरी द्यावं, अशी मानसिकता आहे, वडिलांच्या जागी निवडणूक लढवावी, अशी माझी मानसिकता नाही, हे मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं, पण दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही, तू वडिलांच्या जागी प्रयत्न कर, असा सल्ला ते मला देऊ लागले, याला माझा पूर्णपणे विरोध होता,” असे सत्यजित तांबेंनी सांगितले आहे.

“युवक काँग्रेसचं पद गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला कुठेतरी संधी देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. त्याला विधान परिषदेवर घेतात. यासाठी ज्यावेळी मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे जायचो, तेव्हा तुमच्या घरात तुमचे वडील आमदार आहेत.त्यामुळे तुम्हाला विधान परिषद देता येणार नाही, असं सांगितलं जायचं. वास्तविक माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने नाशिक मतदारसंघ वाढवला आहे. २००९ पासून माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने हा मतदारसंघ उभा केला आहे”, असेही सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या