Narhari Zirwal | “…तर मी नियुक्त केलेले अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य कसे?”; नरहरी झिरवळ यांचा थेट सवाल

Narhari Zirwal | मुंबई : राज्यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाकडून तारीखेवर तारीख मिळत आहे. त्यातच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ यांनी आमदारांना अपात्रतेची दिलेली दोन दिवसांची नोटीस अनधिकृत आहे. कमीत कमी दहा दिवसांची नोटीस द्यायला हवी होती’, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या दाव्यावर बोलत असताना नरहरी झिरवळ यांनी नियमाचा दाखला दिला आहे.

“नव्या अध्यक्षांची निवडही चुकीची ठरते का?”

“अपात्रतेची सात दिवसांपर्यंत नोटीस दिली जाते. त्यांना दोन दिवसांची नोटीस दिली असेल तर त्यांनी माझ्याकडे मुदतवाढ मागायला हवी होती. तशी कायद्यात तरतूद आहे. सात दिवसांच्या पुढेही त्यांना वेळ हवा होता, तर त्यांनी तो मागायला हवा होता. तसेच जर उपाध्यक्ष म्हणून माझ्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता. तर मग माझ्या अध्यक्षतेखाली झालेली नव्या अध्यक्षांची निवडही चुकीची ठरते का?” असा प्रश्न नरहरी झिरवळ यांनी उपस्थित केला आहे.

“माझ्यावर अविश्वास दाखवत असाल तर नव्या अध्यक्षाची मी निवड केली आहे. मग माझ्या अध्यक्षतेखाली निवड झालेल्या अध्यक्षांची निवड चुकीची आहे का? कारण मी अयोग्य असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली झालेली अध्यक्षांची निवडही अयोग्य ठरेल”, अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली आहे.

“भाजप, कुठलीही सेना किंवा इतर पक्षांसाठी मी उपाध्यक्षच असतो”

“माझ्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यामुळे मी दिलेली नोटीस अनधिकृत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांवर साध्या एका नोटीसीने अविश्वास येत नसतो. साध्या सरपंचावर अविश्वास दाखल करायचा असेल नोटीस द्यावी लागते. त्याची पडताळणी होते त्यानंतर ज्यांच्यावर अविश्वास दाखविला गेला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. माझ्यावर अविश्वास दाखल करायचा असेल तर सभागृहातच जावे लागेल, तरच तो अविश्वास दाखल होऊ शकतो. मी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसतो तेव्हा माझ्यासमोर कोणताही गट नसतो. माझ्यादृष्टीने भाजप, कुठलीही सेना किंवा इतर पक्षांसाठी मी उपाध्यक्षच असतो”, असंही नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-