Shabhuraj Desai | “संजय राऊत बोलायला लागले की, लोक चॅनेल बंद करतात”; शंभूराज देसाईंची राऊतांवर बोचरी टीका

Shabhuraj Desai | सांगली : राज्यात सध्या अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत बोलताना उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी बोचरी टीका केली आहे. देसाई आज सांगलीच्या विटा येथे शिंद गटाचे आमदार अनिल बाबर यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिर प्रसंगी बोलत होते.

“राऊत बोलायला लागले की, लोक चॅनेल बंद करतात”

“खासदार संजय राऊत सकाळी बडबडताना किती लोक टीव्ही चॅनल बंद करतात, याचा सर्व्हे करा, राऊत बोलायला लागले, की लोक चॅनल बदलतात हा आपला अनुभव आहे, यावरून ओळखा. संजय राऊत सकाळी मुलाखत घेतात, त्यावेळी किती जण टीव्ही बघतात याचा एकदा सर्व्हे माध्यमांनीच करावा. मी अनुभव घेतलाय.पूर्वी लोक राऊतांना ऐकायचे, आता बंद करतात. त्यामुळं त्यांची दखल सुद्धा घ्यायची गरज नाही”, असा टोला शंभूराजे देसाई यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

पत्रकाराच्या हत्येप्रकरणी प्रतिक्रिया

“पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येचा प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, आरोपीला अटक केलेली आहे. प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हा खून कोणी केला, कोणत्या पार्श्वभूमीवर झाला, करायला कोणी लावला याबाबत मुख्यमंत्री साहेब हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेता येते का? यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कायदा हातात घ्यायचा जर कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याला शोधून काढून पोलिस खात्यामार्फत नक्की शिक्षा केली जाईल”, असेही शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

“विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर”

आगामी अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सुतोवाच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. “विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देण्याचा ठरवलं आहे, त्या दृष्टीने आमचं काम सुरू असून आमचं काम बोलेल”, असा टोलाही त्यांनी लगावल आहे.

“माझं खातं राज्याला उत्पन्न देणारं तिसऱ्या क्रमांकाचे मोठे खातं आहे. मागील दोन वर्षे कोविडमध्ये गेल्याने थोडा महसूल कमी झाला. आता एक महिना दीड महिना शिल्लक आहे, मला जे उद्दिष्ट दिलं आहे त्या माध्यमातून महाराष्ट्राची तिजोरी भरण्याचं काम आम्ही नक्की करू”, असेही शंभुराज देसाई म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-