Eknath Shinde | शिंदे गटाकडून अखेरच्या क्षणी आयोगासमोर लेखी उत्तर सादर; केला ‘हा’ दावा 

Eknath Shinde | नवी दिल्ली : शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील कागदपत्रे आणि लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे.

दुसरीकडे शिंदे गटाकडून मुदत संपत आली तरी लेखी म्हणणं मांडण्यात आलं नव्हतं. अखेर शेवटच्या मिनिटाला शिंदे गटाचे वकील केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल झाले. ते धावत-धावत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले. तिथे त्यांनी शिंदे गटाचं लेखी म्हणणं मांडलं. यावेळी प्रसारमाध्यमांनी वकिलांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आपल्या लेखी उत्तरात धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळावं, अशी विनंती केली आहे.

एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद हे घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे अधिक आहे. निवडणूक चिन्ह देताना संख्याबळ विचारात घेतलं जावं असा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला.

दरम्यान, “21 जूनपासून जो घटनाक्रम घडला, तो सर्व घटनाक्रम आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी युक्तिवादात केला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबरोबरच यापूर्वी निवडणूक आयोगापुढे झालेल्या सुनावणीतील मुद्द्यांचाही समावेश आहे. याचबरोबर शिंदे गटाने ज्या प्रकारे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता, तो दावा नेमका कसा चुकीचा आहे, हे देखील आम्ही या युक्तिवादात सांगितलं आहे”, असे अनिल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :